Loading
ढाका, २० जुलै हिंसाचार आणि अस्थिरतेमुळे बांग्लादेशात सध्या आरक्षण विरोधी आंदोलनाने अत्यंत गंभीर स्थिती निर्माण केली आहे. १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात तब्बल १०५ लोकांचा मृत्यू झाला असून २५०० लोक जखमी झाले. राजधानी ढाका हे आंदोलनाचे केंद्र बनले असून, येथे सरकारी आणि खासगी वाहतूक ठप्प झाली, शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आली आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे १९७१ च्या मुक्ती संग्रामातील सैनिकांच्या मुलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारा निर्णय.
आंदोलकांचा आरोप आहे की हा आरक्षणाचा निर्णय भेदभावपूर्ण आहे आणि सर्व नोकऱ्या मेरिटवर आधारित असाव्यात. आंदोलनकर्त्यांनी या निर्णयाचा विरोध करत, एक समान संधी आणि मेरिट-आधारित नियुक्तीची मागणी केली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी शांततेचा आह्वान केले असले तरी परिस्थिती अजूनही ताणतणावपूर्ण आहे. सरकारने तातडीने मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आणि सैन्य रस्त्यावर उतरवले आहे. याव्यतिरिक्त, शाळा-कॉलेजेस, दुकाने, आणि सार्वजनिक वाहतूक सेवांवर मोठा परिणाम झाला. संचारबंदीमुळे सामान्य जनजीव विस्कळीत झाले असून, आंदोलनकर्ते मात्र अत्यंत आक्रमक आहेत. या आंदोलनाने बांग्लादेशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत. आर्थिक स्थैर्य, सामाजिक शांतेची गरज असताना सरकार आणि आंदोलक यांच्यातील तणाव यापुढे वाढण्याची शक्यता आहे. बांग्लादेशाच्या भविष्यावर या संघर्षाचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे.