Mar, 13 2026

स्वातंत्र्यदिनानिमित्त हाय अलर्ट, दिल्ली, पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याची माहिती


Image Source By : Digital Satta

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट : जम्मूमध्ये कार्यरत दहशतवादी गटाकडून स्वातंत्र्यदिनाच्या आसपास दिल्ली आणि पंजाबमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे दिल्ली , पंजाबसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. बांगलादेशातील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दहशतवाद्यांमधील संभाषणाचा हवाला देत गुप्तचर विभागाने सूचित केले आहे. गुप्तचर यंत्रणांनी सांगितलंय की, सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणावर तैनातीमुळे हा हल्ला १५ ऑगस्टलाच नाही पण एक-दोन दिवसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ जून रोजी स्फोटकं, आयईडीची खेप जम्मू शहराच्या अंतरावर पोहोचली. या स्फोटकांचा वापर आगामी काळात सुरक्षा आस्थापना, कॅम्प, वाहनं किंवा महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.

याशिवाय पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या लगतच्या भागांत कार्यरत असलेल्या कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांचा आयएसआय प्रायोजित संबंध स्वातंत्र्यदिन आणि सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत होता. गुप्तचर विभागाच्या सतर्कतेनुसार, १५ ऑगस्टच्या आसपास मोठ्या संख्येनं लोकांना लक्ष्य करण्यासाठी तयार केलेल्या आयईडीचा वापर केला जाऊ शकतो. यासोबतच सरकारच्या काही निर्णयांवर किंवा कृतींबाबत असंतुष्ट घटकांकडून सूडबुद्धीची कारवाई होण्याची शक्यता असल्यानं धोका आणखी वाढला आहे.

ad