Loading
महाराष्ट्र काँग्रेस मध्ये नवीन युवकांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी या साठी अमीर शेख यांचा एनएसयूआय महाराष्ट्र अध्यक्षपदाचा राजीनामा
एनएसयूआय महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आणि युवक नेते, ऍड. अमीर शेख यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे त्यांचे एनएसयूआय महाराष्ट्र अध्यक्षपदाचे राजीनामा सादर केला.
सुमारे ९ वर्षे या महत्त्वपूर्ण पदावर काम करत असताना, अमीर शेख यांनी एनएसयूआयच्या तत्त्वांनुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथकपणे कार्य केले. कॉलेज अध्यक्ष, राज्य सचिव, आणि राज्य उपाध्यक्ष यासारख्या विविध पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा आणि नेतृत्व दाखवले.
राजीनामा पत्रात, अमीर शेख यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल आभार व्यक्त केले असून, भविष्यकालीन नेतृत्वासाठी नव्या आणि ताज्या विचारांची आवश्यकता व्यक्त केली आहे. त्यांनी एनएसयूआय महाराष्ट्रच्या आगामी पिढीला पुढे नेत असलेल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजीनामा सादर करतांना, शेख यांनी काँग्रेस पक्ष आणि एनएसयूआयच्या नेतृत्वाचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे ऋण व्यक्त केले.
शेख यांनी सांगितले की, ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि एनएसयूआयच्या ध्येयधोरणासाठी कायमपणे बांधिल राहतील आणि भविष्यकालात कोणत्याही भूमिकेतून या संस्थेची मदत आणि समर्थन देत राहतील.
अमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली एनएसयूआय महाराष्ट्राने विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आणि शिक्षण, रोजगार आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या या अथक कष्टांची कदर सर्व स्तरांवर केली गेली आहे .